![]()
जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदारांना निवेदन
हातकणंगले : प्रतिनिधी-

गेली ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या सर्व गोपाळ समाजाला शासकीय स्तरावर अद्याप कायमस्वरूपी अधिवास व मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तसेच गोपाळ समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार श्री. सुशीलकुमार बेल्हेकर यांना हातकणंगले यांना निवेदन सादर करण्यात आले. तळसंदे येथील गोपाळ समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट अग्रेसर झाला आहे. गोपाळ समाज गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत तळसंदे व स्थानिक प्रशासनाकडे न्याय मागणी करत आहे. विशेष म्हणजे दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये सर्वानुमते सर्व्हे क्र. ०६, गट क्र. ७७ मधील २० गुंठे जमीन समाजाच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु अद्याप या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने समाजाच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले. यामध्ये संबंधित २० गुंठे जागा समाजाला कायमस्वरूपी वापरासाठी मिळावी, तसेच शासकीय नियमांनुसार त्याचे कागदोपत्री दस्ताऐवजीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तळसंदे गावातील गोपाळ समाज हा समाजाचा अविभाज्य भाग असून, त्यांना हक्काचे जमीन व अधिवास मिळणे ही काळाची गरज आहे. या लढ्यात शिवसेना पक्ष समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,” असे यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी सांगितले. यावेळी उदयसिंह शिंदे, मा. सरपंच अमरसिंह पाटील, दिग्विजय पाटील, शुभम पाटील, अमोल मोहिते, बच्चन जाधव, प्रेम चौगले, अनिल चौगले, सुनील चव्हाण, अमित जाधव, किसन पवार यांच्यासह तळसंदे गावातील अनेक समाजबांधव उपस्थित होते. तहसील कार्यालयाकडून निवेदनाची दाखल घेऊन लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तहसीलदार श्री. सुशीलकुमार बेल्हेकर यांचेकडून देण्यात आले.
