![]()
आजरा येथील भूमी अभिलेख प्रशासनाची अवस्था

आजरा / हसन तकीलदार
जमीन मोजणीशी महत्वाचे असलेले भूमी अभिलेख कार्यालय शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि जनतेची कामे या कार्यालयावर अवलंबून असतात. जमीन मोजणी, प्रॉपर्टी कार्ड, बँक प्रकरणे, वारसा नोंद, खरेदी दस्त नोंद तसेच बँक बोजा नोंदी यासारख्या विविध प्रकारच्या कामासाठी या कार्यालयाशी काम-धंदे सोडून संपर्क साधावा लागतो. सद्या शेतीच्या मशागतीची व पेरणीची कामे सुरु आहेत. यातून वेळ काढून आपल्या कामासाठी प्रकल्पग्रस्त तसेच शेतकरी भुसंपादनाची कामे मार्गी लावण्यासाठी येत असतात. परंतु कर्मचाऱ्यांची कमी आणि अधिकाऱ्यांच्यावर सोपवलेला अतिरिक्त भार यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे कामाचा उरक होत नसून नागरिकांच्या नाराजी व रोषाला बळी पडावे लागत आहे.
श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरूस्कर आणि दशरथ घुरे हे आज शुक्रवार दि. 13/06/2025 रोजी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत भेटायला गेल्यानंतर कार्यालयात विचित्र परिस्थिती पहायला मिळाली. अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी जाग्यावर नसलेने कर्मचारी अधिकाऱ्यांच्याकडे बोट दाखवतात. तर अधिकारी “नॉट रिचेबल “लागतात. अतिरिक्त कार्यभार असलेल्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत असे कॉ. संपत देसाई यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्यामध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
कॉ. देसाई यांनी याबाबत जिल्हाभूमी अधिकारी भोसले यांच्याशी संपर्क साधला असता आठ -दहा दिवसात आजरा कार्यालयाचा कारभार नीटपणे मार्गी लावू असे सांगितल्याचे सांगण्यात आले. जर येत्या आठ दहा दिवसात याबाबत सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा कॉ. देसाई यांनी दिला आहे.
आजरा येथील भूमिअभिलेख कार्यालयाबाबत पालक मंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी सुधाकर पाटील यांनी किमान शुक्रवारी आजरा कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे असे मत प्रकाश मोरूस्कर यांनी मांडले.
