महावितरण चे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवा

Loading

आजरा अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा / हसन तकीलदार

आजऱ्यातील बहुतांशी नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांना हात घालत न्याय मिळवून देण्यासाठी आजरा अन्याय निवारण समिती सतत कार्यरत आहे. प्रत्येक वॉर्डातील प्रश्न घेऊन त्याबाबत निवेदने देऊन आंदोलने करण्यापर्यंत आजरा अन्याय निवारण समितीने आपली भूमिका चोख बजावली आहे. आता स्मार्ट मिटरचा विषय घेऊन वीज वितरण कंपनीला निवेदन दिले आहे. ग्राहकांची परवानगी नसताना वीज वितरण कंपनी स्मार्ट मीटर बसवणेची जबरदस्ती करीत आहे. स्मार्ट मिटरबाबत अनेक शंका आहेत याबाबत पुरेशी व स्पष्ट माहितीही दिली जात नाही तेव्हा ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविणेचे काम त्वरित थांबवण्याबाबत आजरा वीज वितरण कंपनीला आजरा अन्याय निवारण समितीने निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसविणेत येत आहे. त्याबाबत ग्राहकांचा विरोध व तक्रारी असूनदेखील स्मार्ट मीटर बसविणेत येत आहे. मीटर बसवताना ग्राहकांना सदर मीटर बसवून न घेतलेस आपला विद्युत पुरवठा बंद होणार अशी भीती घालून स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्मार्ट मिटरबाबत अनेक शंका ग्राहकांच्या मनात आहेत.स्मार्ट मीटरने पहिल्यापेक्षा जास्त वीज बिले येत आहेत, मिटरमधून सतत किरणोत्सर्ग होत असल्याने आरोग्याला घातक ठरू शकते, स्मार्ट मीटर बसविणेस होणारा खर्च अप्रत्यक्षपणे ग्राहकांवर लादला जाण्याची शक्यता आहे. पुरेशी माहिती न देता व ग्राहकांची पूर्व परवानगी व स्पष्ट माहिती न देता तसेच विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविणेत येत आहेत त्यामुळे ग्राहकांची बैठक बोलावून स्पष्ट व पूर्ण माहिती दिली जावी आणि सदर मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर परशुराम बामणे (अध्यक्ष ), गौरव देशपांडे (उपाध्यक्ष ), विजय थोरवत (सेक्रेटरी ), पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, जावेद सलाम पठाण, मिनिन डिसोझा, संजय जोशी, विजय यमगेकर आदींच्या सह्या आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *