![]()
आजरा / हसन तकीलदार

येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहाँ म्हणजेच बकरीद उत्साहात साजरी केली. मुफ्ती खालिद खलिफ यांनी बकरीदचे महत्व तसेच बकरीद म्हणजे त्यागाचे व बलिदानाचे प्रतीक या विषयावर प्रवचन दिले. तर मौलाना कुदरत तगारे यांनी नमाज पठण व विश्वशांती, सामाजिक सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.आणि हाफिज इरफान लाडजी यांनी कुतबा दिला.
बकरी ईद सण हा त्यागाचा आणि बलिदानाचा संदेश देतो. प्रेषित इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशाचे पालन करीत कुर्बानी दिली होती. त्यानुसार ही कुर्बानी म्हणजेच बलिदानाचे पालन आजही केले जाते. ज्यांच्याजवळ आवश्यकतेपेक्षा जास्त मालमत्ता आहे त्यांनी जनावर खरेदी करून त्याची कुर्बानी देणे अनिवार्य आहे. या प्रथेमुळे जे आर्थिदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना याचा फायदा होतो. शेतकरी वर्ग, धनगर समाज, मेंढपाळी वर्ग, यांना याचा बहुतांशी लाभ होतो. त्यांच्या पशुना अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळतो. आणि त्यांची आर्थिक गरज दूर होण्यास मदत होते. एकंदरीत कुर्बानीमुळे सामाजिक आणि आर्थिक न्याय साधला जातो. हा सण गरिबाकडे आर्थिक प्रवाह सुरु करतो. मुस्लिमांचे सण हे महागड्या गाड्या, सोने नाणे, वस्तू खरेदी करण्याला प्रोत्साहन देण्यापेक्षा सामाजिक समतल साधण्याकडे भर दिला जातो.
कुर्बानीच्या प्रथेनुसार बलिदान केलेल्या जनावराचे मांस तीन समान भागात वाटले जाते. एक तृतीयांश मांस कुटुंबासाठी, एक तृतीयांश नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यासाठी आणि एकतृतीयांश गरजू गरिबांना दान केले जाते. देशभरात जनावर खरेदीची सुमारे 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्याचप्रमाणे कुर्बानी काळात कपडे, मसाले, मिठाई आणि सुका मेवा खरेदी वाढते त्यामुळे किरकोळ व्यापारात सुमारे दहा हजार कोटी रुपयांची अतिरिक्त उलाढाल वाढते. त्याचप्रमाणे चर्मोद्योग करणाऱ्या उद्योजकांना चालना मिळते.
आजरा येथे आज या सणा निमित्त साधारण पाच ते सहा हजारांचा जमाव होता. ना दंगा, ना गोंधळ सर्वजण अनुशासन पालन करीत एका रांगेत नमाज पठण करून आपापल्या मृत नातेवाईकांच्या शांतीसाठी प्रार्थना करून सिरकुरम्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच हिंदू मुस्लिम मित्र परिवारासाठी वितरण करण्यासाठी आपापल्या घरी निघून गेले. नेहमीप्रमाणे पोलिसांनी आपली भूमिका चोख पार पडली.
