![]()
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळावर शुभेच्छांचा वर्षाव सह धोरणात्मक मागण्यांचे निवेदन
आजरा / हसन तकीलदार
गेली 77 वर्षे लोकांच्या अविरत सेवेत असलेल्या लालपरीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सामान्य माणसाच्या असामान्य जीवनाशी नाळ जुळवून लालपरी आजही अविरत सेवा देत आहे. परंतु सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे लालपरीची वाट बिकट झाली आहे. सामान्य, गोरगरीब जनता आणि प्रामाणिक कर्मचारी व अधिकारी यांच्यामुळे आज लालपरी अस्तित्व टिकून आहे. लालपरीचा पुढचा प्रवास सुरळीत चालावा आणि सर्वसामान्य गोरगरीबांना त्याचा पूर्णपणे लाभ मिळत राहावे याकरिता विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी धोरणात्मक मागण्यांचे आजरा आगारप्रमुख आणि मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.च्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
एस. टी. ने महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची जबाबदारी पार पाडली असून शैक्षणिक संस्था, आठवडी बाजार, जत्रा यात्रा, सोहळा, सणवार, लघुउद्योग यांच्या जडणघडणिमध्ये एस. टी. चा सिंहाचा वाटा आहे. खाजगीकरणाचे उदात्तीकरण करणारे आपल्या सदसदविवेक बुद्धीला जोर देऊन विचार केला पाहिजे. जर एस. टी. नसती तर तुम्ही अधिकारी झाला नसता. हे वास्तव नाकारता येत नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एस. टी.चे घोषवाक्य गतिमान राहायचे असेल तसेच महाराष्ट्रातील एस. टी. पूर्वपदावर येण्यासाठी 50,000 नवीन बसगाड्या खरेदी करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे बजेट महाराष्ट्र सरकारने मंजूर करावे, दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करावी,यामध्ये बेकारी सोसणाऱ्या वडापवाल्यांचा समावेश करावा, विद्यार्थ्यांना एस. टी. प्रवास मोफत करावा, एस. टी. ची भाडेवाड रद्द करावी, एस. टी. ला प्रवासी कर माफ करावा, एस. टी. सवलतीच्या रूपातील सर्व देणे महाराष्ट्र सरकारने द्यावे, एस.टी. ला टोल माफी द्यावी, एस. टी. चे खाजगीकरण रद्द करावे. अशा धोरणात्मक मागण्यांचे निवेदन आजरा आगार व मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
या निवेदनावर कॉ. पद्मिनी पिळणकर (विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र), झूल्पीकार शेख (बहुजन मुक्ती पार्टी उपशाहाराध्यक्ष ), अमित सुळेकर (प्रचारक बहुजन मुक्ती पार्टी ), गोपाळ होण्याळकर (रिपब्लिकन सेना तालुका उपाध्यक्ष ), दशरथ सोनुले (छत्रपती क्रांती सेना ), इर्शाद भडगावकर, प्रसाद पिळणकर, कांचन सावंत, जितेंद्र नवार आदींच्या सह्या आहेत.

