![]()
शिबिरात ३२० विद्यार्थ्यांचा सहभाग
कोल्हापूर / प्रतिनिधी-
प्रबोधन, व्यक्तिमत्व विकास व समाजप्रेरित शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित प्रफुल्लीत बाल विकास केंद्र आयोजित उन्हाळी शिबिर २०२५ आज अत्यंत उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. या शिबिराने मुलांच्या अष्टपैलू विकासासोबतच सामाजिक जाणिवा, कला, नेतृत्व आणि सहकार्य यांचा संगम साधला. समारोप प्रसंगी विशेष कार्यक्रमात आरोग्य, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रांतील तिघा मान्यवरांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५’ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. देवेंद्र रासकर यांना आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी, विक्रम हावळ यांना उद्योगातील नवोन्मेषी वाटचालीसाठी आणि सुप्रिया धराडे यांना शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी कार्यासाठी गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे कार्यक्रमास एक वेगळीच प्रतिष्ठा लाभली. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे दक्षिण उपशहरप्रमुख प्रदीप पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पाटील होते.
स्थानिक महिला बचत गटांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. उपस्थित महिलांसाठी ‘एक मिनिट स्पर्धा’ घेण्यात आली आणि त्यानंतर रंगतदार लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला. त्यामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी केंद्राच्या अध्यक्षा अल्फिया बागवान, संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात ३२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि लाठी-काठी, झुंबा, सूर्यनमस्कार, ध्यान, वाचन, संभाषण कौशल्य, मजेशीर खेळ, स्विमिंग असे विविध उपक्रम पार पडले. शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिरास पालकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी राजाराम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील, विलास पाटील, अनीता पाटील, शिवानी पाटील, शबाना बागवान, प्रिन्स पाटील, श्री पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. सूत्रसंचालन सना मुल्ला व नुजत मुल्ला यांनी अत्यंत प्रभावी केले. शिबिराचे नियोजन रेश्मा काटकर यांनी यशस्वी केले. शिबिराच्या यशामध्ये बिस्मिल्ला नदाफ, राजवर्धन अबदार, सिद्धेश चिले, करिश्मा बागवान, सानिया बागवान, शीतल यादव, कृष्णाई पाटील, वर्धा यादव,क्षितिजा पाटील आणि माधुरी टेके यांचे विशेष योगदान लाभले


