![]()
वीज क्षेत्र बचाव कृती समितीचे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरु
आजरा : प्रतिनिधी –
विविध मागण्यांसाठी तिन्ही वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने संपाचे हत्यार उपसले असून दि. 29 सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने अधिकारी व विजकर्मचारी आंदोलन करीत आहेत. सरकारी मालकीच्या तिन्ही वीज कंपन्याकडून कामगार विरोधी धोरणांची एकतर्फी अंमलबजावणी होत असल्याने तसेच महत्वाच्या व धोरणात्मक बाबींमध्ये कामगार संघटनांच्या मागण्या व हरकतींचा समावेश न करता घाईत व एकतर्फी लादलेले निर्णय कामगारांचे आयुष्य व वीज कंपन्यांच्या भाविष्यावर नकारात्मक परिणाम करणारे ठरणार अशी भीती व्यक्त करीत वीज क्षेत्र बचाव कृती समितीचे टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरु आहे. आता तर कृती समितीने नाईलाजाने ७२ तासांचा संप पुकारला. सद्या विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. त्यामुळे ३३ के.व्ही.वीज लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झालेस कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दुरुस्ती करताना अनंत अडचणी येणार आहेत. आज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने सायंकाळी साडेपाच वाजलेपासून वीज गुल झाली तर बाहेर पाऊस आणि अंधार यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. रात्री उशिरापर्यंत विजेचा थांग पत्ता नव्हता. वीज अधिकारी व कर्मचारी संपावर असल्यामुळे याबाबत योग्य माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे प्रशासनाने आणि सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढून हा प्रश्न मिटवावा आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.
दि. ६ ऑक्टोबर रोजी अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) व अध्यक्ष महावीतरण यांच्या उपस्थितीत ७ संघटनांच्या बरोबर झालेल्या वाटाघटीच्या गोषवाऱ्यामध्ये ज्या बाबी मान्य केल्या त्याच्या विपरीत स्पष्टीकरण गोषवारा पत्रात आहे. वाटाघटित जी स्पष्टता कृती समितीच्या ७ संघटनाना ७ ही प्रश्नाबाबत अप्पर मुख्य सचिव ऊर्जा व महावितरणचे अध्यक्ष यांनी दिली त्याचा गोषवाऱ्यात उल्लेख नसल्याने स्पष्टीकरण मान्य नसल्याने ७२ तासांचा संप पुकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे पत्रात नमूद आहे. कृती समितीने आग्रह केला आहे की, व्यवस्थापनाने पुनरर्चना हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करता याला स्थगिती द्यावी. कृती समितीने सुचविलेल्या सुधारणांचा वास्तवीक दृष्टिकोनातून कंपनीच्या प्रगतीकरिता अंतर्भाव करावा व वाटाघटीची तारीख गोषवाऱ्यात स्पष्ट करावी अशीही मागणी करण्यात आली असून ७२ तासाच्या या संपामुळे विजग्राहकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
