![]()
चंदगड : तातोबा गावडा –
मतदारसंघाचा विकास करून सुद्धा तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला का नाकारले असा प्रश्न उपस्थित करून तुम्ही आगामी निवडणुकीत तुमची चूक सुधारा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले. तर आम्ही काही साधू-संत नाही. तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिलात, तरच आम्हीही तुम्हाला देऊ. त्यामुळे आता पुढील निवडणुकांमध्ये चूक दुरुस्त करा आणि जोमाने कामाला लागा अशी ताकदही त्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अडकुर (ता. चंदगड) येथे आयोजित नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार केला. परंतु मला काही नको, पण कार्यकर्त्यांना न्याय द्या असे यावेळी माजी आमदार राजेश पाटील म्हणाले. तर अजितदादांनी फेटा बांधायला नकार दिल्याचे दुःखही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी स्व. नरसिंहराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले. नामदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाक्य बोलून सर्वांची मने जिंकली. गड आला पण आपला सिंह गेला असे ते म्हणाले. इतकी कामं करूनही चंदगडमध्ये यश मिळाले नाही याचे शल्य त्यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण युतीच्या माध्यमातून लढणार आहोत. जिथे एकमत नाही तिथे स्वतंत्रपणे लढू, पण सर्व सभापती, नगराध्यक्ष युतीचेच होतील. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वागत शिवाजीराव नांदवडेकर यांनी केले. प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केली. यावेळी. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसूर्लेकर, महिला अध्यक्षा शीतल फराटे, युवक अध्यक्ष नितीन दिंडे, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, भैयासाहेब माने, रामापा करिगार, चंदगड अध्यक्ष भिकू गावडे, गडहिंग्लज अध्यक्ष बाबासाहेब पाटील मुगळीकर, भरामाना गावडा, सतीश पाटील, प्रकाश पताडे, अभय देसाई, तानाजी गडकरी, भरमण्णा चौगुले, युवक अध्यक्ष पांडुरंग बेनके उपस्थित होते.


