![]()
एकच जिद्द शक्तिपीठ रद्द : घोषणांनी परिसर दणाणला
आजरा तालुका प्रतिनिधी : राजाराम कांबळे
जनतेची मागणी नसताना, दळणवळणासाठी गरज नसताना राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी रयतेच्या राजासमोर शिवतीर्थावर बळीराजा एकवटला. धो धो संततधार पावसात भिजत महिला शेतकरी डोक्यावर इरलं घेऊन सहभागी झाल्या. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करून शिवतीर्थ ते आजरा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, कॉ. संपत देसाई, उमेश आपटे यांच्या नेतृत्वात भर पावसात भिजत मोर्चा काढण्यात आला. गेली चारपाच दिवसात आजऱ्यात धो पावसाने कहर केला तरीसुद्धा शेतकऱ्यांनी आणि सर्व विरोधीपक्षीय नेत्यांनी पावसाची तमा न बाळगता मोर्चा यशस्वी केला. एकच जिद्द -शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, या सरकारचं करायचं काय?…. अशा अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
