![]()
केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात शिवसेना उभाठा गट आक्रमक
आजरा : प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी घेतलेल्या “ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स” या नवीन निर्णयामुळे शेतकरी आणि सामान्य ट्रॅक्टर धारकांना अंदाजे 50 ते 55 हजार रुपयांचा फटका बसणार आहे. विमनाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक केले असून दि. 18 जुलै 2025 च्या 485 (ई ) जी.आर.नुसार मसूदेची अधिसूचना जाहीर केली गेली. हा शासन निर्णय तोट्याचा असून त्या विरोधात शिवसेना उभाठा गटाने रणशिंग फुंकले आहे.
ब्लॅक बॉक्स हे यंत्र अपघातांनंतर वाहनाची हालचाल, वेग, ब्रेकिंग, इंजिनची माहिती इ. गोष्टींची नोंद करून ठेवते. यामध्ये मायक्रोचिप, सेन्सर, डेटाचिप त्याचप्रमाणे जिपीएस प्रणालीसुद्धा असते त्यामुळे अपघात झालाच तर ही सर्व माहिती उपलब्ध होणार असलेने हे बंधनकारक आहे असे सरकारचे मत आहे. परंतु हा खर्च शेतकरी आणि सामान्य ट्रॅक्टर धारकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाविरोधात शिवसेना उबाठा असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे. अशा आशयाचे निवेदन शिवसेना उबाठाने तहसीलदार यांना दिले. निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले. मालवाहक ट्रॅक्टमध्ये अपघात झालाच तर या ट्रॅक्टरचा वेग किती होता, ब्रेक किती वेळा दाबला गेला, ट्रॅक्टरने अचानक दिशा का बदलली? अशा सर्व प्रकारची माहिती पोलीस आणि विमा कंपनी यांना मिळू शकणार आहे. त्यामुळे अपघाताचे खरे कारण लक्षात येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. परंतु या उपकरणाला बसवण्यासाठी साधारणपणे पन्नास ते पंचावन्न हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे आणि पुढचा रिचार्ज वगैरेचा खर्च वेगळा. सद्या हा निर्णय शेतकऱ्यांवर जरी लागू केले नसले तरी टप्प्याटप्प्याने पुढे जाऊन हे लागू केले जातील. जसे की जिपीएस व इडिआरचा निर्णयही अंमलात येणार अशी माहिती आहे. सद्या या निर्णयाचा मसुदा प्रसिद्ध केला गेला आहे. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत हरकती मागवल्या आहेत. त्यासाठी शिवसेना उबाठा पक्ष या निर्णयाच्या विरोधात असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. तरी केंद्र सरकारने हा निर्णय रद्द केला नाही तर शिवसेना उबाठा केंद्र सरकारच्या विरोधात ट्रॅक्टर मोर्चा काढून याला विरोध करेल असे या निवेदनात म्हटले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट, जागोजागी टोल, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स, वाढते डिझेल पेट्रोलचे दर, पासिंगच्या नव्या अटी,प्रत्येकवेळी पासिंगला वाढलेला खर्च, भाडे मात्र आहे तेवढेच यातून वाहतूकदार मेटाकुटीस आलेला असताना परत हा नवा निर्णय त्यामुळे वाहतूकदार याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

या निवेदनावर संभाजी पाटील (उपजिल्हाप्रमुख), युवराज पोवार तालुकाध्यक्ष), ओमकार मद्याळकर(शहर प्रमुख), अमित गुरव, सुयश पाटील, शांताराम पाटील, महेश पाटील, हिंदुराव कांबळे, प्रणव वंजारे, रोहित होण्याळकर आदींच्या सह्या आहेत.