![]()
आजरा महावितरण समोर काजू उत्पादक संघटना ठिय्या मारणार
आजरा : प्रतिनिधी-
तालुक्यात पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काजू बियांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. ऊस पिकाबरोबर काजुचीही नगदी पीक म्हणून ओळख आहे. तालुक्यात उत्पादन होत असल्यामुळे काजूबियावर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम उद्योगही त्या प्रमाणात आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून विजेच्या लपंडाव सुरु आहे. आणि हा विजेचा लपंडाव चरम सीमेवर पोहोचला आहे. सातत्याने वीज खंडीत होते, विजेच्या दाबामध्ये कमी जास्त प्रमाण होते. काजू प्रक्रिया उद्योगात अडथळे येत आहेत. यंत्रसामुग्री खराब झाल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे विजपुरवठ्यामध्ये सातत्य ठेऊन येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असे निवेदन कॅश्यू मॅन्यूफॅक्चर असोसिएशन तर्फे आजरा महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले. यापूर्वी दि. ९ जून २०२५ रोजी याबाबत निवेदन दिल्याचे स्मरण होणेसाठी पुन्हा स्मरणपत्र दिले आहे. यावर योग्य त्या उपाययोजना आखून लवकरात लवकर अडचण दूर करावी अन्यथा असोसिएशन तर्फे नाईलाजाने आपले कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.

आजरा तालुक्यातील अनेक लघु मध्यम काजू प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी ही असोसिएशन असून सदर उद्योग काही दिवसापासून सातत्याने खंडित होणाऱ्या, विजेच्या दाबात कमी जास्त होत असल्यामुळे यंत्र सामुग्री खराब होणे, उत्पादनात अडथळा येणे यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागते असे निवेदनात नमूद आहे. सद्या पाऊस व वादळवाऱ्यामुळे झाडे, बेटे उन्मळून पडून तारा तुटणे, विजखांब पडणे अशा घटना घडत असून हे जरी मान्य असले तरी पावसापूर्वी ही कामे आपणाकडून पूर्ण करून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
या निवेदनावर प्रकाश कोंडूस्कर (अध्यक्ष), दयानंद भुसारी (उपाध्यक्ष), परेश पोतदार (सचिव), विकास फळणेकर (खजिनदार), विश्वास जाधव, भास्कर निकम, विलास पाटील, जयसिंग खोराटे, मनोहर पाटील, विजय कुंभार, उत्तम सलामवाडे, तानाजी कोंडूस्कर, जीवन शेवाळे आदींच्या सह्या आहेत.