![]()
सवलतीच्या दरात साखर सर्वांना मिळावी या मागणीसाठी आंदोलन
आजरा / राजाराम कांबळे
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्यामार्फत ऊस पुरवठादार आणि दहा हजारच्या वर शेअर्स रक्कम असणाऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वितरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु कमी शेअर्स रक्कम असणाऱ्या व कारखाना स्थापनेच्यावेळी मदत केलेल्या सभासदांना साखर मिळणार नसलेने त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे या विरोधात एकत्र येऊन आंदोलन छेडणार अशा आशयाचे निवेदन कोरीवडे तालुका आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी कारखान्याला
दिले आहे.
कारखान्याची स्थापना करीत असताना अनेक सभासदांनी आपल्याकडे शेअर्स रक्कम जमा केलेली आहे. पाचशे पासून ते दहा हजार पर्यंत शेअर्स रक्कम कारखानाकडे जमा आहेत. पण साखर वाटप करताना तुम्ही कारखाना प्रशासनाने दहा हजारच्या वरील शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदांना साखर वाटप करण्याचे धोरण अवलंबले. साखर कारखान्याने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक आहे.
पंचवार्षिक निवडणूकीला सामोरे जात असताना आपल्याकडून सर्व सभासदांना साखर वाटप करण्याचे वचन कारखाना प्रशासनाने दिले होते. मात्र भागभांडवल वाढवण्याच्या नादात कारखाना प्रशासन बहुतांश सभासदांवर अन्याय करीत आहे असा आरोप निवेदनातून केला आहे.
कारखान्याच्या सरसकट सभासदांना साखर वाटप करा अन्यथा शेअर्स रक्कम व्याजासहित परत करा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मतदानासाठी पाचशे पर्यंतचे सभासद तुम्हाला चालतात आणि तेच सभासद साखर वाटपासाठी चालत नाहीत. हे साखर कारखान्याचे धोरण अन्याय असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली असून सरसकट सभासदांना सवलतीच्या दरात साखर वाटप करणार नसतील तर ज्यांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा लाभ देणार नाहीत अशा सभासदांची शेअर्स रक्कम व्याजासहित परत करावी अशी मागणी करीत या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास वंचित आणि अन्यायग्रस्त सभासदांना संघटित करून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


