![]()
चंदगड : प्रतिनिधी-
बोगस ठराव, खोट्या सह्या आणि बेकायदेशीर पद्धतीने व्यवहार करून सडेगुडवळे गावातील सरकारी पड जमिन हडप केल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून केलेल्या व्यवहारांमुळे ग्रामपंचायतीची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करून शासनाने हे व्यवहार तात्काळ थांबवावेत आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. गावातील गट नंबर ६२४ आणि ६४४ मधील हेरे सरंजाम हद्दीतील सरकारी पड जमिनीचा बेकायदेशीररीत्या खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आला आहे. खोट्या सह्या, बोगस ठरावांच्या आधारे ही जमीन काही व्यक्तींनी स्वतःच्या नावावर करून घेतली. या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने फौजदारी गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. शासनाने देखील या व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तसेच लाभार्थी दलालांवर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. ही जमीन वर्षानुवर्षे गावातील काही कुटुंबांकडून कसली जात असून त्या कुटुंबांचा या जमिनीवर प्रत्यक्ष हक्क असताना त्यांना डावलून दलाल व काही भ्रष्ट लोकांनी संगनमताने हे व्यवहार झाले आहेत असा आरोप आहे. गावातील सरकारी पड जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार हे कुठलीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्वसूचना न देता, खोट्या कागदपत्रांच्या आधारे पार पाडण्यात आले ते बेकायदेशीर आहेत. तरी ते रद्दबातल करून ग्रामस्थांना न्याय द्यावा. अशी मागणी आहे. या जमिनीवर गावाचा हक्क असून, त्या ग्रामविकासासाठी वापरण्यात याव्यात, अशी आमची भूमिका आहे. मात्र काही दलालांच्या आणि भ्रष्ट अधिका-यांच्या संगनमताने हे व्यवहार पार पाडण्यात आले आहेत,” असा आरोप झेंडे यांनी केला आहे.

ख-या लाभार्थी आणि वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या ग्रामस्थांना ही जमीन खुली करून देण्यात यावी. त्याचबरोबर बोगस व्यवहार करणा-या दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि संबंधित महसूल अधिका-यांकडे दाद मागण्यात आली. मात्र, जर न्याय मिळाला नाही तर आंदोलनास न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत सरपंच सरपंच प्रभावती बुधाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील, संध्या भिकाजी झेंडे, विमल विठ्ठल जांबरेकर, वंदना संतोष गावडे, संतोष कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य भागोजी झेंडे, रामदास झेंडे, सुनील सावंत, संतोष माईनकर, बामजी गावडे तसेच गावातील तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
