![]()
भात कापणी आणि मळणीसाठी सद्या यांत्रिकीकरणाचा जास्त वापर

आजरा : हसन तकीलदार
तालुक्यातील डोंगराळ भागात असलेले छोटेसे गाव किटवडे आहे. पावसाळ्याबरोबर या गावालाहीअवकाळी पावसानेही झोडपले. त्यात मजुरांची टंचाई त्यामुळे हातातोंडाला आलेल्या भात कापणी आणि मळणीसाठी ग्रामीण भागात सुगीची धांदल सुरु झाली असून शेतकरी सद्या यांत्रिकीकरणाचा जास्त वापर करीत आहेत. या काळात कोरीवडे येथील युवा शेतकरी धनाजी देसाई यांनी आपल्या शेतातील भाताच्या मळणीसाठी चक्क थार गाडीचा वापर केल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. वाढत्या महागाईत शेतीव्यवसाय परवडत नाही. खते औषधाचे दर वाढलेले आणि मजुरांचा तुटवडा, जनावरांचा कमी वापर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पाऊस व मजूर टंचाईवर मात करण्यासाठी धनाजी देसाई यांनी शक्कल लढवीत चक्क थार गाडीने भाताची मळणी केली. पावसाने उघडीप दिल्याने एकदमच सुगीची कामे सुरु झाली आहेत. सर्व शेतकरी आणि मजूर कामात गुंतले आहेत. कामे वेळेत होण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. अवकाळी पावसामुळे आम्हाला भात बडवून काढावे लागले यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले म्हणून शेवटी थार गाडीने मळणी काढायचे ठरवले असे धनाजी देसाई यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
या प्रयोगाविषयी भागात जबरदस्त चर्चा सुरु असून सोशल मीडियावर त्यांच्या या मळणीची क्लिप व्हायरल होत आहे. अनेकांनी याचे स्टेटससुद्धा लावले आहेत. अनेकांनी याला लाईक करून अवकाळी पाऊस आणि मजूर टंचाईवर चर्चाही सुरु केली आहे. शेवटी शेतकऱ्याचा रुबाबच न्यारा असे लोकं म्हणत आहेत. तरीही थार गाडी देसाई यांनी रात्रंदिवस राबून, परिश्रम करून तसेच शेतीपूरक पोल्ट्री व्यावसाय करून घेतली आहे. त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांना इथपर्यंत पोहचवले आहे. ही गाडी वडीलोपार्जित नाही तर सकाळी उठल्यापासून रात्री दीड दोन वाजेपर्यंत राबून ही थार गाडी घरात आली आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या या युवा शेतकऱ्याचा इतरांनीही आदर्श घेतला पाहीजे. नोकरी, पोल्ट्री आणि शेती यांची सांगड घालत धनाजी देसाई यांनी ही मजल मारली आहे. स्वतःच्या अहोरात्र प्रामाणिक मेहनतीने ही विश्वनिर्मिती केली आहे. हेही टीका करणाऱ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे.