![]()
इस्लामपूर : प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने इस्लामपूर तहसीलदार सचिन पाटील यांना वीज वितरण कंपनी आणि अदानी समूहावर फौजदारी गुन्हा दाखल करा मिनीचे निवेदन दिले. इस्लामपूर शहर आणि उपनगरात विज महावितरण कंपनीने अदानी गँगच्या माध्यमातून विज ग्राहकांचा अक्षरशः मानसिक छळ सुरू केला असून विज ग्राहकांची कोणतीही तक्रार नसताना अदानी गँगकडून सरळ घरात घुसून जुने विज मीटर काढून नवीन अदानीचे प्रीपेड विज मीटर बसवले जात आहे.
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने याचा तीव्र निषेध करत,
विज ग्राहकांची तक्रार नसताना हे प्रीपेड विज मीटर का बसवले जात आहे? या मीटरमुळे विज ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याला कोण जबाबदार आहेत? या प्रीपेड मीटरची किंमत तब्बल १२,००० रुपये ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. शिवाय, हे मीटर बसवल्याने ग्राहकांना नेमका काय फायदा होणार, याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. तरीही विज महावितरण कंपनी ग्राहकांवर हे प्रीपेड मीटर लादण्याचे पाप का करत आहे?असा सवाल शकिल सय्यद यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशात स्पष्ट उल्लेख आहे की, प्रीपेड विज मीटर बसवणे कोणावरही बंधनकारक नाही. तरीही हा शासनाचा आदेश धुडकावून अदानी गँगकडून घरात घुसून विज ग्राहकांचा छळ होत आहे. जुने मीटर काढून नवीन अदानीचे प्रीपेड विज मीटर बसवले जात आहे. हे लोकशाहीला साजेसे नाही आणि ही हुकूमशाही आम्ही शिवसैनिक कदापिही खपवून घेणार नाही. असा इशाराही दिला आहे
शासनाच्या वतीने अदानी गँग आणि विज महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तसेच प्रीपेड मीटर बसवण्यात सामील असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच, बसवलेले प्रीपेड विज मीटर तात्काळ काढून पुर्ववत जुने मीटर बसवावे. अन्यथा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा शकिल सय्यद यांनी दिला आहे.
तसेच, शहर आणि उपनगरातील विज ग्राहकांना शकिल सय्यद यांनी आवाहन केले आहे की, हे प्रीपेड मीटर बसवणे कोणावरही बंधनकारक नाही. कोणीही हे मीटर बसवू नये. या प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय, या मीटरची १२,००० रुपये किंमत ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. युनिटचे दर काय आहेत, याची माहिती नाही. याचा फायदा सरकारला किंवा ग्राहकांना होणार नाही, तर मग अदानी, टेलिकॉम किंवा जिओ यांना होणार का, हेही स्पष्ट नाही.
ज्या विज ग्राहकांचे मीटर त्यांच्या परवानगीशिवाय किंवा तक्रार नसताना बसवले गेले आहेत, त्यांनी कंपनीला लेखी पत्र देऊन प्रीपेड मीटर काढून पुर्ववत जुने मीटर बसवण्याची मागणी करावी. तसेच, फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, याचा खुलासा कंपनीने करावा, अशी मागणी करणारे पत्र विज महावितरण कंपनीच्या उपअभियंत्यांच्या नावे देऊन त्याची पोहच घ्यावी, असे आवाहन शकिल सय्यद यांनी विज ग्राहकांना केले आहे.
हे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वीकारले. यावेळी शकिल सय्यद यांच्यासमवेत तात्यासाहेब बामणे, रामराव थोरात जमिर नालाबधं अरुण कुपाडे इकबाल वाईकर, शकिल पटवेकर सुहेल अन्सारी राजु खान सय्यद रमजान सिकंदर शेख दिपक कळसे आदि अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

