![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
भारत देशाच्या सुरक्षेसाठी सैनिकांचे मोलाचे योगदान आहे. निवृत्तीनंतर या सैनिकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन. देशाची सेवा केलेल्या सैनिकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. यापुढेही माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी मी नेहमी तत्पर राहीन, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
टाकळीवाडी येथे अमर जवान स्मारक, सैनिक हॉल व सैनिक प्रवेशद्वार यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी आमदार यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.
आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, देशाचे रक्षण करण्यासाठी शिरोळ तालुक्यातील अनेक सैनिक देशाच्या सीमेवर सेवा बजावत आहेत. टाकळीवाडी आणि सैनिक टाकळी गावातील जवान हे या भूमीचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आमदार निधीतून सैनिक हॉल उभारण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
ते पुढे म्हणाले की, सैनिक हा राष्ट्राचा कणा आहे. त्यांच्यामुळे देश सुरक्षित आणि सक्षम राहतो. त्यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्या विविध योजना व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. शिरोळ तालुक्यातील माजी सैनिकांच्या समस्यांवर सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन.
या कार्यक्रमास सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष महादेव बदामे, डॉ. दगडू माने, सैनिक कल्याण विभागाचे सहाय्यक अधिकारी सुभाष डोंगरे, सरपंच मंगलताई बिरणगे, तुकाराम चिगरे, गुरुदत्तचे संचालक बबनराव चौगुले, शिवाजीराव माने, शिवाजीराव सांगले, खुशाल कांबळे, बाबासाहेब वनकोरे, धनपाल कोथळी, तंटामुक्त अध्यक्ष केंदबा कांबळे, संस्थापक रमेश निर्मळे, सूर्यकांत बदामे, दादा खोत, सरदार चोपडे, अनिल लोंढे, विजय पाटील, संजय माने, पी. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
