![]()
संबंधित कंत्राटदारांचे बिल न देण्याची मागणी : शिवप्रेमी शंकर नाळे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे धाव
जयसिंगपूर प्रतिनिधी
येथील कोल्हापूर सांगली महामार्ग लगत रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा दिमाखदार सोहळा त्यावेळी संपन्न झाला होता. मात्र यंदाच्या पावसामध्ये या शिवतीर्थाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसत असून संबंधित कंत्राटदारांची बिले ही नगरपालिकेने अदा करू नयेत अशी मागणी शहरातील जागरूक नागरिक शंकर नाळे यांनी केली आहे. मुख्याधिकारी टीना गवळी यांना तसे निवेदन नाळे यांनी दिले आहे.
राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महामानवांच्या पुतळ्यांची उभारणी करण्यासाठी आपल्या देशात अनेक वेळा आंदोलने करण्यात येतात. बऱ्याच वेळेला अशा मागणीमध्ये पुढाकार घेऊन महामानवांचे पुतळे उभे केले जातात. त्यानंतर निवडणुकाही होतात. अशा निवडणुकांच्या वेळी राजकीय नेते मंडळी अमुक एक पुतळा उभा केला आणि त्यासाठी चे सर्व श्रेय घेतात. त्याची प्रसिद्धीही करतात आणि निवडून येतात हे आजचे वास्तव आहे. मात्र अशा अनेक जसे की जयसिंगपूरचे शिवतीर्थ अशी स्थळे उभारली जातात. त्याची निगा किंवा संगोपन अथवा जतन करण्याचे काम कोणतीही यंत्रणा करीत नाही. देशामध्ये असे अनेक स्मारक दुर्लक्षित आहेत. शिवाय ज्यांना ही स्मारके उभा करण्याची कंत्राटी दिली होती त्यांना तशी बिले सुद्धा दिली जातात.
आता नव्यानेच या शहरात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतीचे उभारण्यात आलेले बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची शहरातून तक्रार होत आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत अशी मागणी होत आहे. शंकर नाळे यांनी केलेल्या मागणीचे पुढे काय होते याकडे शहराचे लक्ष लागून आहे. अल्पावधीतच पालिकेची निवडणूक होत आहे. निवडणूक येण्यापूर्वी पुतळा उभारावा, उभारणार्याची चौकशी करावी, उभारला असेल तर त्या कामाचा दर्जा अशी अनेक प्रकरणे जनतेतून विचारणा होतात. नुकतेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा शहरातील कोणत्या जागेत उभारावा हा जागेचा वाद पुन्हा उफाळून येत असताना छत्रपती शिवरायांचा उभारलेला पुतळा आणि त्या बाजूचे बांधकामाचा दर्जा हाही विषय समोर येत आहे. या शहराच्या कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य तत्पर मुख्याधिकारी टीना गवळी काय करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
