![]()
आजरा : हसन तकीलदार

२०१४ साली १० ग्रॅम सोन्याचे दर २८ ते ३० हजार रुपये दरम्यान होता. त्यानंतर याच सोन्याचा दर वाढत जाऊन आज लाखाला पोहचला आहे. ज्या सोन्याला २८ हजार दर गाठण्यासाठी ७० ते ७२ वर्षे लागली त्याच सोन्याला लाखाला पोहचायला केवळ १० वर्षे लागली. सोन्याचे दर वाढण्याची अनेक कारणांची मिमांसा होताना दिसत आहे. पुढे जाऊन सोन्याचे दर कितपत वाढतील किंवा घटतील हे सांगणे कठीण असले तरी आजच्या घडीला सर्वसामान्यांना मात्र लग्न सराई आणि इतर शुभकार्य करणे जिकरीचे झाले आहे. जे लोक घरच्या लग्नात दीड लाख रुपयांची पत्रिका छापतात त्यांना काही फरक पडत नाही. परंतु आयुष्यभर राबून पोरीच्या लग्नाला लाख दीड लाख जमवणाऱ्या बापाला मात्र याचा नक्की फरक पडत आहे.
देशात सोन्याने लाखाचा टप्पा गाठल्यामुळे सर्वसामान्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत तर सर्वसामान्य जनतेला लग्नात अडचणी येत आहेत. दागिने खरेदी करताना नाकीनऊ होत आहे. गरीब लोक सोने हे एक महत्वाचे बचत आणि गुंतवणुकीचे साधन मानतात. सोन्याने लाखाची पायरी ओलांडल्यामुळे गोर गरिबांना लग्न सराईत दागिने करताना खूप अडचण निर्माण होत आहे.
सोन्याचे भाव वधारणे म्हणजे भयंकर मंदीचे लक्षण मानले जाते. तो एक दुष्ट चक्राचा भाग असतो. मंदिमध्ये गुंतवणूकदारांचा बाजार आणि सरकार वरील विश्वासउ डतो. त्यामुळे ते सोने खरेदी करायला लागतात आणि परिणामी सोन्याचा भाव वाढतो. गुंतवणूकदार हे प्रामुख्याने मोठे व्यवसायिक आणि भांडवलदार असतात. सर्वसामान्यांना सोन्याचे दर वाढल्यामुळे याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. एखाद्या गरीबाला आपल्या मुलीचे लग्न करायचे असेल तर किमान दोन ते तीन तोळे सोने खरेदी करावे लागते. हे दोन ते तीन तोळे सोने खरेदी करण्यासाठी तीन ते चार लाख रुपये सद्या लागत आहेत. त्यामुळे गरिबांना मुलींची लग्न करताना पंचायत होत आहे.
